पुणे : ‘गर फिरदौस बर रूये ज़मी अस्त| हमी अस्तो हमी अस्तो हमी अस्त’ म्हणजे पृथ्वीवर कुठे स्वर्ग असेल तर तो इथे आहे. अशा शब्दात ज्याचे वर्णन केले जाते त्या जम्मू-काश्मीरच्या निसर्ग सौंदर्याने कायमच पर्यटकांसह चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, कलाकार यांनाही भुरळ घातली आहे. त्यामुळे अनेक चित्रपट या पृथ्वीवरच्या नंदनवनात चित्रित झाले आहेत. हे नाते अधिक दृढ व्हावे या उद्देशाने सरहद संस्थेने राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्था आणि राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय यांच्या सहकार्याने पुण्यात चार ते सहा फेब्रुवारी दरम्यान जम्मू-काश्मीर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन केले आहे.
काश्मीरविषयी आणि कश्मीरी कलाकार असलेले चित्रपट यात दाखवले जाणार आहेत. यामध्ये ‘कश्मीर की कली’सारख्या जुन्या चित्रपटांसह नवीन चित्रपटही दाखविण्यात येणार आहेत. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात हा महोत्सव होणार असून, यासाठी जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सतपाल मलिक, त्यांचे सल्लागार खुर्शिद अहमद गनाई, काश्मीरमध्ये मल्टीप्लेक्स उभारणारे विजय धर यांच्यासह चित्रपट निर्माते, कलाकार उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती या महोत्सवाचे संचालक मुश्ताक अली आणि सरहद संस्थेचे संस्थापक संजय नहार यांनी एका पत्रकाद्वारे दिली.